
तुमसर: गुरुपौर्णिमा म्हणजे श्रद्धेचा, कृतज्ञतेचा आणि आत्मबोधाचा सोहळा. ही फक्त गुरूला नमस्कार करण्याची परंपरा नाही, तर ही त्या महान व्यक्तीच्या कार्याची आणि विचारधारेची पुनर्स्थापना आहे, जी व्यक्ती एका समाजाला नवी दिशा देऊ शकते. आजच्या बदलत्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय परिस्थितीत गुरूंची भूमिका केवळ शैक्षणिक मर्यादांपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती परिवर्तनाची मशाल घेऊन चालणाऱ्या विचारवंताची झाली आहे.
पुरोगामी विचारांची गरज:-
आज आपण विज्ञान-तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात आहोत. जुने चौकटीतले विचार, परंपरेत अडकलेली शिक्षणपद्धती, अंधश्रद्धा, जातपात आणि विषमता यांतून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी आजचा गुरू ‘पुरोगामी विचारांचा वाहक’ असणे गरजेचे आहे. तो प्रश्न विचारायला शिकवणारा, चाकोरीबाहेर विचार करायला उद्युक्त करणारा असावा. तो विद्यार्थ्यांना ‘का?’ आणि ‘कसे?’ या प्रश्नांची उत्तरे शोधायला शिकवतो, फक्त ‘हेच खरं’ सांगत नाही.
आजच्या गुरूंचे कार्य – समाजाला दिशा देणारे:-
गुरू हे केवळ पाठमोरी काळी फळ्यावर लिहिणारे शिक्षक नसून, ते विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, संवादक, मूल्यसंस्कार देणारे व्यक्तिमत्त्व आहेत. आज गुरूंनी डिजिटल शिक्षण, पर्यावरण संरक्षण, लैंगिक समानता, संविधानाचे मूल्य, मानवी हक्क, सामाजिक न्याय या विषयांवर विद्यार्थ्यांमध्ये सजगता निर्माण करणे आवश्यक आहे. त्यांचा शालेय ज्ञानापुरता मर्यादित रोल नसून, ते सामाजिक परिवर्तनाचे बीज रोवणारे असले पाहिजेत.
गुरूंचे आचरण – उदाहरणातून शिकवण:-
शब्दांपेक्षा आचरण अधिक प्रभावी असते. गुरूंचे आचरण म्हणजे शुद्धता, शिस्त, सत्यनिष्ठा, करुणा आणि समतेचे मूर्तिमंत उदाहरण असावे. विद्यार्थ्यांनी फक्त त्यांच्याकडून अभ्यासच नाही, तर माणूस म्हणून कसे घडायचे हे शिकले पाहिजे. एका विद्यार्थ्याच्या आयुष्यात गुरूंचे स्थान आई-वडिलांएवढेच महत्त्वाचे असते. त्यामुळे त्यांचे वर्तन पारदर्शक, प्रेरणादायी आणि काळाच्या पुढे जाणारे असणे आवश्यक आहे.
आदर्श शिक्षक – एक प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व
ज्ञानाचा साठा नसलेला गुरू केवळ प्रवचनकर्ता होतो; पण ज्ञानात गूढता आणि सर्जनशीलता निर्माण करणारा शिक्षक विद्यार्थ्यांना सृजनशील बनवतो. तो स्वतःच्या चुका मान्य करतो, नव्या गोष्टी शिकायला तयार असतो, आणि विद्यार्थ्यांच्या मतांचा आदर करतो. तो केवळ गुणांवर नाही, तर क्षमतांवर लक्ष केंद्रित करतो. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा विचार करणारा गुरूच त्यांना आत्मभान देतो.
सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संदर्भात गुरूंची भूमिका:-
आज गुरूंनी विद्यार्थ्यांना केवळ नोकरी मिळवणारा नव्हे, तर समाजासाठी जबाबदार नागरिक बनवणे हे ध्येय ठेवायला हवे. भारतीय लोकशाही, संविधान, सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता, विविधतेतील एकता या मूल्यांची बीजे शिक्षकांच्या कृतीतून विद्यार्थ्यांच्या मनात रोवली गेली पाहिजेत. सामाजिक दृष्टिकोनातून, शिक्षक हा सामाजिक समतेचा प्रचारक असावा. जाती, धर्म, वर्ग यामधील भेद मिटवणारा तो एक पथप्रदर्शक ठरतो.
सांस्कृतिक दृष्टिकोनातून, गुरूंनी भारताची विविध सांस्कृतिक परंपरा, लोककला, भाषिक विविधता याचे जतन व संवर्धन करायला हवे. राजकीय दृष्टिकोनातून, शिक्षकाने विद्यार्थ्यांना विचारशक्ती देणारे, प्रश्न विचारणारे, संविधानाचे मर्म समजणारे आणि जबाबदारीने मतदान करणारे नागरिक घडवले पाहिजे.
अपेक्षा…
गुरुपौर्णिमा ही फक्त अभिवादनाचा दिवस नसून, ती आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. प्रत्येक गुरूने स्वतःला विचारावे – “मी केवळ शिक्षक आहे की परिवर्तनाचा एक दीपस्तंभ?” समाजाला योग्य दिशा देणारे गुरू म्हणजेच खरी गुरुपौर्णिमेची पूजा.
– राहुल डोंगरे –” पारस निवास ” शिवाजी नगर तुमसर. जि. भंडारा. म. रा. मो. न.9423413826





Total Users : 883187
Total views : 6488655
