
तुमसर :तुमसर शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये सोमवारी झालेली घडामोड ही अक्षरशः “सेवेसाठी आले आणि त्रास घेऊन परत गेले” अशी ठरली. संपूर्ण कार्यालयात पार्सलच्या गठ्ठ्यांचा एवढा खच पडला होता की, ग्राहकांना चालायला, उभं राहायला, आणि काउंटरपर्यंत पोहोचायलाही जागा उरली नव्हती. पोस्टाच्या हॉलमध्ये पार्सल्स काउंटरजवळ व ग्राहकांच्या वाटेवर रचून ठेवले होते. त्यामुळे वयोवृद्ध, महिला, आणि दिव्यांग ग्राहकांना अधिकच अडचणींचा सामना करावा लागला.

“पार्सलसाठी पोस्ट आहे की नागरिकांसाठी?”
एका स्थानिक नागरिकाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले, “काउंटरवर पोहोचायचं म्हणजे सर्कस करत वाट काढावी लागते. ही काय सुविधा म्हणायची?” अनेकांनी ही बाब पोस्ट निरीक्षकांकडे मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोस्ट निरीक्षक अजय चिंतामण आडंगे यांचे कार्यालय देखील रिकामेच आढळले.खुर्ची रिकामी, फाईल्स अर्धवट उघड्या, आणि अधिकाऱ्यांची अनुपस्थिती हीच दृश्ये नागरिकांच्या तक्रारींच्या उत्तरात उभी होती.
प्रशासनाची हद्दपार जबाबदारी?
तुमसर पोस्ट विभागाकडे ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात कामासाठी अवलंबून आहेत. अशा ठिकाणी ग्राहक सेवा ही प्राथमिकता असायला हवी, पण सध्याची परिस्थिती पाहता ‘गोंधळ, दुर्लक्ष आणि अनुपस्थिती’ हेच येथे चालते, अशीच भावना नागरिकांमध्ये आहे.दरम्यान पार्सल व्यवस्थापनासाठी स्वतंत्र जागेची सोय करावी.ग्राहकांची काउंटरपर्यंत सहज पोहोचण्याची व्यवस्था करावी.पोस्ट निरीक्षकांनी नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहावे व जबाबदारी स्वीकारावी. उच्च अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी.अशी मागणी नागरिकांनी केली.जर हीच परिस्थिती अशीच राहिली, तर येत्या काळात नागरिकांनी संयुक्तरित्या लेखी तक्रार देण्याचा इशारा दिला आहे.





Total Users : 883187
Total views : 6488655
