
तुमसर: तुमसर येथील शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या तर्फे भारत स्वच्छता अभियानांतर्गत “स्वच्छ भारत – सुंदर भारत” हा स्वच्छता उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण केली.
रॅलीत राष्ट्रपिता महात्मा गांधी व राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या वेशभूषेत विद्यार्थी सहभागी झाले होते. स्वच्छतेचा संदेश देणारे हे रूप नागरिकांचे विशेष आकर्षण ठरले. गांधीजी व गाडगे महाराज यांच्या विचारांचा संदर्भ देत विद्यार्थ्यांनी “आपला परिसर स्वच्छ ठेवा”, “स्वच्छतेतच आरोग्य आहे”, “स्वच्छ भारत – सुंदर भारत” अशा प्रभावी घोषणांनी वातावरण दणाणून टाकले.
रॅलीत आरएसपी पथक, स्काऊट पथक, हरित सेना तसेच बँड पथक सहभागी झाले होते. ध्वनिक्षेपणाद्वारे स्वच्छता गीतांचे प्रसारण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हातातील फलक व जोशपूर्ण घोषणा पाहून नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. या वेळी प्राचार्य राहुल डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “सुदृढ आरोग्य हीच जीवनाची खरी किल्ली आहे. शाळा, वर्ग, घर आणि सार्वजनिक स्थळ स्वच्छ ठेवण्यासाठी श्रमदानाचा संस्कार अंगीकारा. स्वच्छतेची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासूनच केली, तर निश्चितच सुदृढ भारत आणि विकसित भारत घडेल.”
कार्यक्रमात ज्योती बालपांडे, दीपक गडपायले, श्रीराम शेंडे, संजय बावनकर, नितुवर्षा मुकुर्णे, विद्या मस्के, प्रीती सेलोकर, अशोक खंगार, सारिका आठोडे, सुकांक्षा भुरे, श्रेया उरकुडे, अंकलेश तिजारे, कु. बारई, बेनिता रंगारी, दिपक बालपांडे, नारायण मोहनकर, विद्या देशमुख, बंदिनी, दातेबाई, मानकर बाई, झनकेश्वरी सोनेवाणे आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा सहभाग, त्यांचा आनंद, राष्ट्रीय एकात्मता आणि समाजजागृतीला चालना देणारी ही रॅली नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरली.






Total Users : 883108
Total views : 6488546
