अर्जुनी मोर गोंदिया प्रतिनिधी/ अवि कुमार मेश्राम
अर्जुनी मोरगाव:- उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत पावसाळा आला. तरी अद्याप प्रशासनाची गाठ सुटता सुटेना अशी म्हणण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. तर दुसरीकडे पुरात कोणाचा बळी जाईल. तेव्हाच प्रशासन जागेल काय…! अशी विचारणा डोंगरगाव- रेगेंपारातील गावकरी करीत आहेत.दोन दशकापासून लालफितशाहीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या एका पुलाची ही व्यथा आहे.
सडक/अर्जुनी तालुक्यातील डोंगरगाव व रेगेंपार ही दोन्ही मोठी गावे आहेत. या गावातील लोकांच्या पुढाकारामुळे दोन दशकापुर्वी दोन गावांना जोडणारा पुल बांधला गेला. पुल बांधून तयार आहे. त्याला केवळ अप्रोच रोड नाही. त्या अभावी पुलाचा वापर बंद आहे. पुलावर लाखों रूपये खर्च झाले. अप्रोच रोडचेही काम सुरू झाले होते. तेव्हा अप्रोच रोडच्या नकाशावरून वाद झाला. तेव्हापासून काम बंद आहे. त्यात वीस वर्षे उलटली.
गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मागील हिवाळी अधिवेशनात काळात या प्रश्नाकडे लक्ष वेधले गेले. तेव्हा तातडीने यात लक्ष घाला अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पाठोपाठ भूमिअभिलेख खात्याच्या अधिकाऱ्यांनीही भेटी दिल्या. तेव्हा नकाशात चुका आढळल्या. त्या दुरूस्त करण्यास प्रशासकीय हालचाली वाढल्या. जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी या प्रश्नावर अर्धा डझनांवर वैठका घेतल्या. काहींना तंबी दिली. दरम्यान नवे उपविभागीय अधिकारी वरूणकुमार शहारे येथे बदलून आले. त्याला महिना उलटला.पावसाळाही आरंभ झाला. तरी अद्याप पुलाचे काम आरंभ झालॆ नाही. पुलाअभावी शेती कामासाठी पाण्यातून जावे लागते. विद्यार्थ्यांनाही या समस्येला तोंड द्यावे लागते. अनुचित घटना घडल्यानंतर प्रशासन,आमदार, खासदार जागतील काय…! असा लोकांचा संतप्त प्रश्न आहे.
लवकरच प्रश्न मार्गी लागेल यासंदर्भात काही लोकांचे मला फोन आले.मी नव्याने रुजू झालो आहे.लोकं पायपीट करतात याची जाणीव आहे.भूमी अभिलेख विभागाच्या अधीक्षकांकडून जागेची मोजणी करायला लावली.नकाशा मंजूर केला.सोमवारी मी हे प्रकरण पाठविले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात गेलं आहे.लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल.
वरुणकुमार शहारे उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव